Pages

वसंतगड



किल्ले वसंतगड (बामणोली,सातारा)
 इतिहास
 वसंतगडाची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली. इ.स. १६५९मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. वसंतगडाजवळच मसूरला सुलतानजी जगदाळे राहत होता. अफजलखान चालून आला त्यावेळी वतनाच्या लोभाने जगदाळे फितुर झाला. वसंतगड घेतल्यावर मराठ्यांनी अकस्मात छापा घालून जगदाळेस पकडून गडावर आणले व फितुरीबद्दल त्याचा गडावर शिरच्छेद केला. शिवरायांचा कठोर न्याय वसंतगडाने याची देहा याची डोळा अनुभवला. पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते.इ.स. १७०० साली औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. व त्याचे नाव 'किली-द-फतेह' असे ठेवले. पण इ.स. १७०८ साली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला
 गडावरील प्रेक्षणीय स्थळे
 गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे. आत जाताच डाव्या हातास एका घुमटीत गणेशाची सुंदर मूर्ती आहे. येथून सरळ जाणार्‍या पायवाटेने गेल्यानंतर आपण गडाच्या मध्यभागी असलेल्या श्री चंद्रसेन महाराजांच्या मंदिराशेजारी येऊन पोहोचतो. मंदिर सुरेख असून आत गाभार्‍यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसर्‍या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदिर परिसर पाहून डाव्या बाजून मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे गेल्यास वाटेत आपणास चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. पुढे कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळि आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत. गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्‍चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे..
 कसे जावे-
 पुणे-बेंगलोर महामार्गावर तळबीड फाट्याला उतरुन तीन कि. मी. पश्चिमेकडे असलेल्या तळबीडला जावे लागते. कराडवरुन एस. टी. बसेस ची सोय आहे. वसंतगड इतिहासप्रसिद्ध अशा तळबीड परिसराचे रक्षण करणारा किल्ला होता. मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई या तळबीड गावचे होते.
 वसंतगडास भेट देण्यासाठी आधी कराड गाठावे. येथून उत्तरेला दहा कि.मी. अंतरावर गडाच्या पायथ्याशी असणार्‍या तळबीड गावात दाखल झाल्यावर समोरच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्मारक दिसते. गावातूनच गडावर वाट जाते. गडावर पोहोचण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
 दुसरा रस्ता सुपने या गावातूनही आहे.
 तिसरा रस्ता हा वसंतगड या गावातून जाणारा आहे.कोकणात जाताना खिडींत असणारा हा रस्ता पूर्वीचा राजमार्ग होता.

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।