Pages

सिंहगड




किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची: ४४०० मीटर
डोंगररांग: भुलेश्वर, पुणे
श्रेणी: मध्यम
जिल्हा: पुणे

पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ किमी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायर्‍यांसारखा दिसणारा खांदकड्याचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा ह्यामुळे पुण्यातून कुठूनही तो पटकन दिसून येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूख गडावरून दिसतो.

इतिहास :
हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहिकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांचे निधन झाल्यावर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये सिंहगड पण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्याचा अधिकारी होता हा मूळचा राजपूत होता पण तो बाटून मुसलमान झाला.
सिंहगड हा मुख्यत्र: प्रसिद्ध आहे, तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे, शिवाजी महाराज जेव्हा आग्र्‍याहून सुटून परत आले, तेव्हा त्यांनी मोगलांना दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तानाजीने कोंडाणा आपण घेतो म्हणून कबूल केले.
या युद्धाबाबत सभासद बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो:
तानाजी मालूसरा म्हणून हजारी मावळियांचा होता. त्याने कबूल केले की,‘कोंडाणा आपण घेतो ‘, असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्यांशी व तानाजी मालुसरा सुभेदार यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली दुसरी ढाल समयास आली नाही, मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरि वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ),याने हिंमत धरून, कुल लोक सावरून, उरले राजपुत मारिले, किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजाना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली. तेव्हा ते म्हणाले ,‘एक गड घेतला, परंतु एक गड गेलामाघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.
इ.स. १६८९ च्या मे महिन्यात मोगलांनी मोर्चे लावून हा गड घेतला. पण पुढे चार वर्षांनी १६९३ मध्ये विठोजी कारके आणि नावजी बलकवडे यांनी कोंडाणा परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. शनिवार दि २ मार्च इस १७०० या दिवशी छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावरती निधन झाले.पुढे इ.स. १७०३ च्या मे महिन्यात हा किल्ला परत मोगलांकडे गेला व स्वत: औरंगजेबाने हा किल्ला पाहून त्याचे नाव बक्षिंदाबक्ष’ (ईश्वराची देणगी) ठेवले. पुढे इ.स. १७०५ च्या जुलै महिन्यात हा गड मराठ्यांनी परत ताब्यात मिळवला.

पहाण्याची ठिकाणे :
१) पुणे दरवाजा :- 
गडाच्या उत्तरेला हा दरवाजा आहे शिवकालाच्या पूर्वीपासून ह्याच दरवाजाचा वापर मुख्यत: होत असे. पुण्याच्या बाजूस असणारे असे हे एकामागोमाग एक असे तीन दरवाजे आहेत. यापैकी तिसरा दरवाजा हा यादवकालीन आहे.
२) खांद कडा :-
दरवाजातून आत आल्यावर ३० ते ३५ फूट उंचीचा असा हा खांद कडा लागतो. यावरून पूर्वेकडील पुणे, पुरंदरचा परिसर दिसतो.
३) दारूचे कोठार :- 
दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार होय. दि ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.
४) टिळक बंगला :-
रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.
५) कोंढाणेश्वर :-
हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.
६) श्री अमृतेश्वर भैरव मंदिर :-
कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मुरत्या दिसतात भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे
७) देवटाके:-
तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.
८) कल्याण दरवाजा :-
गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. या ठिकाणी,

" श्रीशालीवाहन शके १६७२ कारकीर्द
श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान"

असा शिलालेख आढळतो.

९) उदेभानाचे स्मारक :-
दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे, तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता.
१०) झुंजार बुरूज :-
झुंजार बुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात, तर खाली पानशेतचे खोरे दिसते, पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.
११) डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा :-
झुंजार बुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला होता.
१२) राजाराम स्मारक :-
राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणार्‍या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ.स १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.
१३) तानाजीचे स्मारक :-
अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिध्द तानाजीचे स्मारक दिसते. तानाजी स्मारक समितीच्यावतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ वद्य नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

पोहोचण्याच्या वाटा :
१) पुणे - कोंढणपूर मार्गे :-
पुणे - कोंढणपूर बसने कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून कल्याण दरवाजातून आपण गडावर जातो. या मार्गाने दोन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.
२) पुणे दरवाजा मार्गे :-
पुणे - सिंहगड या बसने जाताना वाटेत खडकवासला धरण लागते. या मार्गाने तीन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.
याशिवाय पि.एम.टी. च्या बसने किंवा स्वत:च्या वहानाने थेट गडावर जाता येते.

राहाण्याची सोय: गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय: गडावरील हॉटेल्स यामध्ये जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय: देवटाक्यांमधील पाणी बारामहिने पुरते.
जाण्यासाठी लागणारा वेळ: पायथ्या पासून २ तास लागतात.

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।