Pages

भुदरगड




किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची: ३२०८ मीटर
डोंगररांग: डोंगररांग नाही
श्रेणी: मध्यम
जिल्हा: कोल्हापूर
इतिहास :
हा अजुनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. थोरल्या महाराजांनी गडाची पुनर्बांधणी केली व एक प्रबळ लष्करी ठाणे बनविले. दुर्दैवाने हा गड पुन्हा अदिशहाच्या ताब्यात गेला. १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला. जिंजीवरुन परत येताना, छत्रपती राजाराम महाराज या गडावर काही काळ वास्तव्यास होते.
अठरावे शतक सरताना, परशुरामभाऊ पटवर्धनांनी हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर १० वर्षांनी करवीरकर छत्रपतींनी हा किल्ला जिंकून घेतला. १८४४ साली कोल्हापूर संस्थानात झालेल्या बंडात हया गडावरील शिंबदीने भाग घेतला होता. बाबाजी आयेरकर हा शूर गडकरी त्यावेळी होता, त्याला सुभाना निकम याने आपल्या ३०० साथीदारांसह उत्तम साथ दिली होती. इंग्रजांनी यावेळी डागलेल्या तोफांनी गडाचा मुख्य दरवाजा व तटबंदीचा भाग जमीनदोस्त झाला होता.

पहाण्याची ठिकाणे :
पेठ शिवापूर गावातून डांबरी सडक भुदरगडावर जाते. वाटेत महादेवाचे मंदीर व त्या समोर असलेला सुबक नंदी लागतो. या मार्गाने गडावर पोहचताच उजव्या हाताला भैरवनाथाचे वेगळया धाटणीचे हेमाडपंथी मंदीर दिसते. मंदीराभोवती ओवर्‍या, कमानी व दिपमाळा आहेत.मंदीरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ व तोफ आहे.
देवळामागील वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाडयात गडसदरेचे अवशेष आहेत. वाडयाच्या पलिकडे करवीरकर छत्रपतींनी जिर्णोध्दार केलेले पुरातन शिवमंदीर आहे. सभा मंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापित केला आहे. मंदीर मुक्कामासाठी योग्य आहे.
वाडयाजवळील पायवाटेने पुढे गेल्यावर भुदरगडचे वैभव असलेला बांधीव दुधसागर तलाव लागतो. यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे झाले आहे. तलावाशेजारी भग्नावस्थेतील भवानी मंदीर मंदीरात आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज देखणी मुर्ती आहे. तलाव उजव्या हाताला ठेवून काठाने पुढे गेल्यास अनेक समाध्या दिसतात. आणखी पुढे गेल्यावर गुहेत असलेले व गुहेच्या बाहेर सभा मंडप असलेले मंदीर लागते. मंदीरात अनेक देवतांच्या मुर्ती दिसतात. तेथुन झाडीतून मळलेल्या वाटेने उत्तरेकडे पुढे गेल्यास, आपण एका छोटया तलावाजवळ येतो. त्या ठिकाणी समाध्या आहेत. या ठिकाणी गडाची उत्तम स्थितीत असलेली उत्तर तटबंदी आहे. तटातील दगडी जिन्याने तटावर चढले असता, आपणास गड पायथ्याच्या पेठ शिवापूर गावचे सुंदर दर्शन होते.
पुन्हा माघारी दुधसागर तलावाजवळ यायचे तलाव जेथे संपतो, तेथे डाव्या हातास श्री महादेवाचे सुबक नक्षीकाम असलेले मंदीर दिसते. पुर्वेकडच्या सरळ वाटेने पुढे गेल्यास नामशेष झालेले गडाचे प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूनी दगड लावलेल्या वाटेने खाली उतरल्यावर एक भलीमोठी चौरस शिळा व या शिळेत कोरुन काढलेली १०० चौफूटांची खोली (पोखर धोंडी) दिसते. येथून पुन्हा माघारी आल्यावर प्रवेशद्वाराच्या बाजूला एक नंदी दिसतो. त्यासमोर जमिनीच्या पोटात खोदून काढलेले भुयार आहे. भुयाराच्या पायर्‍या उतरुन आत गेल्यावर अन्य मुर्त्यांसोबत जखुबाइची शेंदरी मुर्ती दिसते.आता आपण जागोजागी जिने असलेल्या पश्चिम तटबंदीवर चढायचे व भैरवनाथ मंदीरापर्यंत चालत जायचे. त्या ठिकाणी तटबंदीत आणखी एक बुजलेला दरवाजा दिसतोगडावर चिर्‍याच्या कोरडया पडलेल्या २ विहिरी व दोन तलाव आहेत .परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
१) कोल्हापूरहून गारगोटीला जाणार्‍या अनेक एसटी बसेस आहेत. गारगोटी वरून पाल नावाच्या गावात जायचे, अंतर साधारण ५ कि.मी आहे. तिथपर्यंत जाण्यास खाजगी वहाने मिळतात. पालपासून पेठशिवापूर साधारण अर्ध्या तासाचे अंतर आहे स्वत:चे वहान असल्यास आपण वाहन थेट भुदरगडावर घेऊन जाऊ शकतो.
२) स्वत:चे वाहन असल्यास गारगोटी - पुष्पनगर - शिंदेवाडी मार्गे राणेवाडी मार्गे पेठशिवापूर - भुदरगड गाठता येते.

राहाण्याची सोय:
गडावर जेवणाची व्यवस्था नाही.
जेवणाची सोय:
भैरवनाथ मंदीर मुक्कामासाठी योग्य आहे.
पाण्याची सोय:
गडावर चिर्‍याच्या कोरडया पडलेल्या २ विहिरी व दोन तलाव आहेत परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे.
गडावर पिण्याच्या पाण्यासाठी भैरवनाथ मंदीराच्या मागे हातपंप आहे.
सूचना:
गड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे ३ ते ४ तास.

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।