इंदुरीचा किल्ला (गढी)
किल्ल्याचा प्रकार: भुई किल्ले
किल्ल्याची ऊंची: १७५० मीटर
डोंगररांग: डोंगररांग नाही
श्रेणी: सोपी
जिल्हा: पुणे
तळेगाव - चाकण रस्त्यावर, तळेगाव पासून ३ किमी अंतरावर इंदुरी
गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी आहे. या गढीला इंदुरीचा
किल्ला म्हणून ओळखले जाते. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन
म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले.
छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांनी हा किल्ला बांधला होता. त्यांची
समाधी इंद्रायणी नदीच्या काठी असलेल्या पुरातन बनेश्वर मंदिराजवळ आहे. इंदुरी
गावापासून भंडारा डोंगर ३ किमी अंतरावर आहे. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे
मंदिर व बौध्द कालिन गुहा आहेत.
मुंबई व पुण्याहून वर दिलेली तिनही ऎतिहासिक
ठिकाणे एका दिवसात पहाता येतात.
इतिहास:
छ. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे
यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे होते. इ.स.१७०५ ते १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे
यांनी गुजरात प्रांतात धडक मारुन बडोदे पर्यंतचा प्रदेश काबिज केला. छ.शाहू
महाराजांनी ११ जानेवारी १७१७ मध्ये खडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे
सरसेनापती म्हणून नियुक्ती केली.
सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून
मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. इ.स.१७२०-२१
मध्ये खडेराव दाभाडे यांना इंदुरीची गढी बांधली, त्याला "इंदुरीचा किल्ला ", सरसेनापतींची गढी" या नावानेही ओळखले जाते.
खडेराव दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंबर १७२९
मध्ये तळेगावच्या जून्या राजवाड्यात झाले. त्याची समाधी इंद्रायणी नदी काठावरील
बनेश्वर मंदिराजवळ आहे.
पहाण्याची ठिकाणे:
तळेगावहून चाकणला जातांना डाव्या बाजूला
इंद्रायणी नदीकाठी किल्ल्याची भक्कम तटबंदी व बुरुज आजही पाहायला मिळतात. या
तटबंदीच्या कडेकडेने इंदुरी गावात प्रवेश केल्यावर किल्ल्याचे पूर्वाभिमुख भव्य
प्रवेशव्दार दिसते. प्रवेशव्दाराच्या दोनही बाजूस भव्य बुरुज आहेत. किल्ल्याच्या
दगडी बांधणीच्या प्रवेशव्दाराच्या कमानीवर दोनही बाजूस शरभ कोरलेले असून मधोमध
गणपती कोरलेला आहे. प्रवेशव्दाराच्या वरील बाजूस नगारखाना बांधलेला असून त्याचे
बांधकाम मातीच्या वीटा वापरुन केलेले आहे. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी
देवड्या आहेत.
किल्ल्ल्यावर कडजाई देवीचे मंदिर आहे.
किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वहाणारे इंद्रायणीचे पात्र व दुरवरचा
प्रदेश दिसतो. किल्ल्याची तटबंदीची रूंदी ३ फूट आहे. बुरुजांचा फांजीपर्यंतचा भाग
दगडांनी बांधलेला असून त्यावरील भाग वीटांनी बांधलेला आहे.तटबंदी व बुरुजांमध्ये
जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे.
भंडारा डोंगर :-
तुकाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे पावन
झालेल्या भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर आहे. मंदिराच्या विरुध्द बाजूस
असलेल्या भक्त निवासाजवळून एक पायवाट खाली उतरत जाते. या पायवाटेने १५ मिनिटे
उतरल्यावर दगडात कोरलेली बौध्द्कालिन लेणी पहायला मिळतात. यापैकी एका गुहेत
तुकाराम महाराज साधनेसाठी बसत असत. या लेण्यांमध्ये एक दगडात कोरलेला स्तुप आहे.
या स्तुपावरून हि बौध्द लेणी हिनयान कालिन असावीत.लेण्यांसमोर एक बारमाही पाण्याचे
टाक आहे.
पोहोचण्याच्या वाटा:
मुंबई-पुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव
हे मोठे शहर आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ३ किमीवर इंद्रायणी
नदीवरील २ पूल आहेत. यातील डाव्या बाजूच्या पुलावरुन जाणारा रस्ता इंदुरी गावात
जातो, तर उजवीकडील रस्ता इंदुरी गावाच्या
बाहेरून जातो. इंद्रायणी नदीवरील पुलावरूनच आपल्याला इंदुरीचा किल्ला दिसायला
लागतो. किल्ल्यात जाण्यासाठी तटबंदीच्या कडेकडेने जाणार्या रस्त्याने तटबंदी संपे
पर्यंत चालत जावे . पुढे डाव्या बाजूस एक गल्ली आहे. त्या गल्लीत वळल्यावर समोरच किल्ल्याचा
भव्य दरवाजा दिसतो.
भंडारा डोंगर :- मुंबई-पुणे रेल्वेमार्ग व
महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ५
किमीवर डाव्या बाजूस भव्य कमान उभारली आहे. तेथून भंडारा डोंगरावर जाण्यासाठी
पक्का रस्ता आहे. खाजगी वहानाने डोंगरावरील मंदिरापर्यंत जाता येते.मंदिराच्या
विरुध्द बाजूस असलेल्या भक्त निवासाजवळून एक पायवाट खाली उतरत जाते. या पायवाटेने
१५ मिनिटे उतरल्यावर दगडात कोरलेली बौध्द्कालिन लेणी पहायला मिळतात.
राहाण्याची सोय:
रहाण्याची सोय तळेगावात आहे.
जेवणाची सोय:
खाण्याची सोय तळेगावात आहे
पाण्याची सोय:
पिण्याचे पाणी सोबत बाळगावे.
सूचना:
मुंबई व पुण्याहून इंदुरीचा किल्ला, बनेश्वर मंदिर, भंडारा डोंगर, चाकणचा किल्ला ही चारही ऎतिहासिक
ठिकाणे एका दिवसात पहाता येतात.
No comments:
Post a Comment