Pages

तिकोना




किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची: ३८५० मीटर
डोंगररांग: लोणावळा
श्रेणी: मध्यम
जिल्हा: पुणे
मुंबई - पुणे हमरस्त्यावरुन दिसणारे लोहगड आणि विसापूर किल्ले आपल्याला सर्वांना माहीत आहेत. याच किल्ल्यांच्या मागील बाजूस पवन मावळ प्रांतात असणार्‍या तिकोना ऊर्फ वितंडगड याची आपणं ओळख करून घेऊया. लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांच्या मागे हा किल्ला असल्याने थेट नजरेस पडत नाही. द्रुतगती महामार्गावरून मात्र हा किल्ला सहज दृष्टीक्षेपात येतो. बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. प्राचीन बंदराना घाटमाथ्याशी जोडणार्‍या अनेक घाटवाटा या परिसरात आहेत. त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मीती केली होती. साधारणत: या परिसरातील लेणी ही बौध्द आणि हिनयान पध्दतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले ८०० ते १००० या काळात बांधलेले असावेत.

इतिहास :
इ.स १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. या गडा बद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी १६५७ मध्ये कोकणातील माहुली ,लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला. किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळावर देखरेख ठेवण्यासाठी होत असे. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. १२ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदर तहानुसार, १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये किल्ल्यावर इंग्रज व मराठे यांच्यात लढाई झाली. यात किल्ल्याचे बर्‍याच प्रमाणावर नुकसान झाले.आजमितिस किल्ल्याची मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे.

पहाण्याची ठिकाणे :
गडाचा घेरा फार मोठा नसल्यामुळे एक तासातं सर्व गड पाहून होतो. गडाच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे वळावे. थोडे अंतर चालून गेल्यावर एक पाण्याचे टाके आणि गुहा लागते.गुहेत १० ते १५ जणांची राहण्याची होते. मात्र पावसाळ्यात गुहा राहण्यास अयोग्य आहे. गुहेच्या बाजूने वर जाणारी वाटेने थेट बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वाराच्या पायर्‍या ह्या दमछाक करणार्‍या आहेत.
दरवाज्यातून आतं शिरल्यावर उजवीकडे पाण्याची टाकं आहे. तर डावीकडे तटबंदीचा बुरुज दिसतो.सरळ थोडे वर गेल्यावर एक वाट उजवीकडे उतरते. येथे पाण्याची काही टाकी आढळतात. येथून माघारी फिरून सरळ वाटेला लागावे. ही वाट आपल्याला काही तुटलेल्या पायर्‍यांपाशी घेऊन जाते. येथून वर गेल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे. मंदिरा मागे पाण्याचा मोठा खंदक आहे. याला वळसा घालून गेल्यावर आपणा ध्वजस्तंभाच्या जागी पोहोचतो.
बालेकिल्ल्यावरुन समोरच उभा असणारा तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोर्सेचा डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवनेचा परिसर आणि फागणे धरण हा सर्व परिसर न्याहळता येतो. गडावरून संपूर्ण मावळ प्रांत आपल्या नजरेत येतो. सर्व गड फिरण्यास १ तास पुरतो.
पोहोचण्याच्या वाटा :
१) बेडसे लेण्या मार्गे :-
अनेक ट्रेकर्स लोहगड, विसापूर ,बेडसे लेणे आणि तिकेना असा ट्रेकही करतात. यासाठी बेडसे लेण्या करुन तिकोनापेठेत जाता येते.
२) ब्राम्हणोली मार्गे :-
अनेक ट्रेकर्स तुंग आणि तिकोना असा ट्रेकही करतात. यासाठी तुंग किल्ला पाहून तुंगवाडीत उतरावे आणि केवरे या गावी यावे. येथून लाँचने पलिकडच्या तीरावरील ब्राम्हणोली या गावी यावे. ब्राहणोली ते तिकोनापेठ हे अंतर ३० मिनिटांचे आहे.
३) तिकोनापेठ मार्गे :-
गडावर जाणारी मुख्य वाट ही तिकोनापेठ या गावातून जाते. यासाठी लोणावळ्याच्या दोन स्टेशन पुढच्या कामशेत स्टेशनावर उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी बस पकडून काळे कॉलनी मध्ये उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी अशी बस सेवा अथवा जीपसेवा उपलब्ध आहे. काळे कॉलनी ते तिकोनापेठ अशी देखील जीपसेवा उपलब्ध आहे. या बसने किंवा जीपने तिकोनापेठ गावं गाठावे. कामशेतहून सकाळी ८.३० ला सुटणारी पौंड बस पकडून थेट तिकोनापेठ या गावी उतरता येते. तसेच कामशेत ते मोर्से बस पकडून ही तिकोनापेठला उतरता येते. तिकोनापेठेतून ४५ मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचतो. वाट फार दमछाक करणारी नसून अत्यंत सोपी व सरळ आहे. किल्ल्यावरील दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक वाट जाते, या वाटेने २० मिनीटांतच बालेकिल्ला गाठता येतो.

राहाण्याची सोय:
पावसाळा सोडून इतर सर्व ऋतुत १० ते १५ जणांना गुहे मध्ये राहता येते.
जेवणाची सोय:
गडावर जेवणाची सोय नाही, आपणं स्वत: करावी.
पाण्याची सोय:
गडावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकं आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ:
पायथ्या पासुन पाऊण ते एक तास लागतो.

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।